पानिपत

पानिपत स्मृती दिवस.

पौष शुद्ध अष्टमी बुधवार १४ जानेवारी १७६१.

 

भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल 261 वर्षे पूर्ण झालीत. अहमद शाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मराठे मावळे प्राणपणाने लढले.

 

 

स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योद्धे या निकराच्या लढाईत कामी आले. १४ जानेवारी १७६१ हा दिवस आम्ही कदापि विसरणे शक्य नाही. लाखांनी बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. याच कारणाने संक्रांतीचा तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही, आमच्या आया बहिणी संक्रांतीसारख्या मोठ्या सणाला काळी वस्त्र परिधान करतात.

कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-कालीं होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानिपती !!
गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी

 

मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या. उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. पानिपत होणे हा वाक्प्रचारही रुजला.

 

पण पानिपत म्हणजे नक्की काय?

  • कुरुक्षेत्रानंतर भारतभूमीवर घडलेला घनघोर संग्राम
  • मराठ्यांच्या पराक्रमाची सर्वोच्च शौर्यगाथा
  • राष्ट्राच्या रक्षणासाठी केलेला सर्वस्वाचा होम
  • महाराष्ट्राच्या प्रत्येक उंबरठ्याने राष्ट्रहितासाठी यज्ञात वाहिलेली समिधा
  • "आम्ही अब्दालीचा हिसाब बाळगत नाही.!" असे म्हणत अखंड हिंदुस्तानासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिगरबाज मराठ्यांच्या तीन पिढ्यांनी गिलच्यास (रोहिले आणि अब्दालीचे सैनिक) आपल्या तलवारीचे पाणी पाजून आपल्या झुंजारवृत्तीचा करून दिलेला परिचय
  • चौदा-पंधरा वर्षे वयाच्या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या कुमारांपासून मजबूत हाडापेराच्या म्हाताऱ्यांनी काळाच्या  छाताडावर पाय रोवून केलेला मदमस्त तांडव
  • आणि स्वतःला क्षत्रिय समजणाऱ्या राजपूत, जाट, शीख, डोग्रा, ठाकूर सारख्या तथाकथित लढवय्यांनी बायकांच्या पदराआड लपून पाहिलेला तमाशा..

 

युद्ध म्हटले की त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का ?
मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का ?

 

या युद्धानंतर काय झाले ? खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण. तो पराजयातला असामान्य विजय होता कारण त्यामुळेच सिकंदरच्या काळापासून सुरू असलेल्या वायव्य प्रांताकडून होणाऱ्या आक्रमणाला कायमचा विराम मिळाला.

 

तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा ! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली. अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही. घरी जाऊन तो मेला. पुन्हा "अल्लाह हु अकबर" च्या आरोळ्या खिंडीपलीकडून आल्या नाहीत. आर्यावर्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही.

हेच तर साधायचे होते या युद्धातून ! साधले ही ! मग पराभव कुठे झाला !

म्हणूनच पानिपत हा मराठी साम्राज्याचा सर्वोच्च शौर्य दिवस.. पानिपत ही मराठ्यांनी देशासाठी दिलेली सर्वोत्तम आहुती होती. पानिपतचे युद्ध म्हणजे जाज्वल्य अभिमान वाटायला हवा होता कारण पंजाब- सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत ! त्यामुळे पानिपत ही साधी लढाई नाही, तर हे महाभारताएवढेच मोठे आणि महत्वाचे महायुद्ध होते.

आज दुर्दैवाने पानिपत म्हटले की आपल्यांकडूनच पराभव हेच प्रथमदर्शनी डोळ्यासमोर येते. आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका!! या अर्थी पानिपत ही एक प्रचंड मोठी शिकवण आहे !!

मराठे एकाकी लढले ! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत ! तरी देखील मराठा एकाकी पडला, पण अडला नाही तर नडला आणि थेट भिडला !! "बचेंगे तो औरभी लढेंगे" म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाही ! परंतु मराठा एकाकी का पडला ?? आपल्याविषयी विश्वास निर्माण करण्यास का कमी पडला ?? परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका का वाटला ?? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे ! आणि ही भळभळती जखम आहे.

मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा, आपला अभिमान, आपले देशप्रेम, आपला त्याग लोकांना कधी कळलाच नाही आणि तो कळावा पण आपण कधी प्रयत्नही केले नाहीत कारण आम्हाला पानिपताच्या युद्धाच्या पराभवाची लाज वाटते. आपणच आपला इतिहास विसरलो मग तो इतर प्रांतीय का लक्षात ठेवतील? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व सुद्धा आपण मराठी माणसापुरते मर्यादित करून टाकले आहे. आपल्या पेशव्यांचे कर्तृत्व एवढे मोठं पण आम्ही त्यांना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादात इतके संकुचित करून टाकले की त्यांना इतिहासात स्थानच राहिले नाही. त्याची आजची परिणीती काय तर आज देशाच्या राजकारणात मराठी माणसाला नगण्य महत्व.

मा. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पानिपतला गेले होते तेव्हा त्यांनी खास करून काला आम या मराठ्यांच्या युद्ध स्मारकाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी बोललेलं वाक्य प्रत्येक मराठी माणसाने मनावर कोरून ठेवायला हवं - या भूमीत मराठे जे लढले ते हिंदुस्थानाच्या संरक्षणासाठी लढले, आपल्या स्वतःसाठी नाही.

पानिपताच्या त्या शापित भूमीवर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्व मराठा वीरांना विनम्र अभिवादन. म्हणूनच पानिपत ही समस्त मराठ्यांनी अभिमानाने मिरवावी अशी अश्वत्थाम्याची भळभळती जखम आहे.

 
मी भावनिक होऊन मराठ्यांचा पराभव झाकण्याचा प्रयत्न करतो आहे असे अजिबात नाही. काही लाख मराठे मारले गेले आणि पेशव्यांचा दारुण पराभव झाला ही गोष्ट अमान्य करताच येणार नाही. तसे नसते तर मी त्याला भळभळती जखम असे म्हटलेच नसते. माझा मुख्य उद्देश परंतु त्या पराभवातून सुद्धा जी गोष्ट साध्य झाली त्याच्याकडे लक्ष वेधायचे होते. आपल्या देशावर वायव्य दिशेकडून धर्मांध आक्रमणे सतत चालूच होती. अहमद शाह अब्दाली सुद्धा अफगाणीच. परंतु जरी तो या युद्धात जिंकला असला तरी त्याच्या सैन्याची पण अपरिमित हानी झाली. तो इथून प्रचंड लूट घेऊन निघाला पण वाटेत सुरजमल जाट सारख्या लोकांनी त्यालाच लुटले त्यामुळे गझनी प्रमाणे उलटून परत येण्याचे धैर्य त्याच्यात शिल्लक राहिले नाही. सिकंदर पासून सुरु झालेली ही आक्रमणे त्यानंतर पूर्ण थांबली. आणि ते त्या युद्धाचे सगळ्यात मोठे फलित होते. असो.
 
इराणच्या नादीर शहाने उत्तरेत केलेल्या अत्याचारांना ठोस प्रतिउत्तर देणे हा मराठ्यांचा पानिपत कूच करण्याचा मुख्य उद्देश होता. देशाचे संरक्षण याच्यासारखा उदात्त हेतू ठेऊन ही मोहीम आखली गेली पण दुदैव की ते त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत.
 
परंतु पराभवाच्या काही प्रमुख कारणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
  • कोणालाही सपाट भूमीवर कसे युद्ध करावे याचे ज्ञान नव्हते आणि अनुभवही नव्हता.
  • शिवाजी महाराज अथवा पहिला बाजीराव यांचे युद्धकौशल्य अथवा हेरगिरी कशी करावी यांचा कोणीही नीट अभ्यास केला नव्हता.
  • नानासाहेब हे पेशवे पंतप्रधान असून देखील स्वतः युद्धावर गेलेच नाहीत. एवढ्या मोठ्या महायुद्धाच्या काळात ते पुण्यात बसून राहिले आणि त्यांच्या दिनचर्येत एक टक्का सुद्धा बदल झाला नाही. या गोष्टीचा सैन्याच्या मानसिकतेवर किती विपरीत परिणाम होईल याचा त्यांनी विचार केला नाही.

  • पेशव्यांमधील भाऊबंदकीमुळे या काळात मराठी साम्राज्याचे अपरिमित नुकसान झाले. पहिल्या बाजीरावांचे जेष्ठ पुत्र म्हणून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे पेशवे झाले खरे पण जेव्हा या मोहिमेचे नेतृत्व करायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली. धाकटे बंधू रघुनाथराव यांना उत्तरेत लढाई करण्याचा अनुभव असून देखील या मोहिमेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली नाही. युद्ध जिंकले तर भाऊ शिरजोर होईल ही भीती. मग आपला चुलत भाऊ सदाशिवराव (चिमाजी अप्पांचा पुत्र) हा अनुनभवी असून देखील त्याला ही कामगिरी देण्यात आली. परत मनात भीती की तो जिंकला तर डोईजड नको व्हायला म्हणून मग आपल्या एकोणीस वर्षाच्या कोवळ्या मुलाला (विश्वासराव) सुद्धा सेनापती म्हणून नेमण्यात आले.
  • असेही म्हटले जाते की पेशव्यांच्या पत्नीला अशी भीती वाटली की जर आपला पती उत्तरेत गेला तर येताना बापाप्रमाणे एखादी मस्तानी घेऊन यायचा तेव्हा त्याला न जाऊ देण्याची पराकाष्ठा करण्यात आली.
  • पेशवाईतील लोकांना आपण युद्धात हरू शकतो अशी स्वप्नात देखील शंका आली नाही त्यामुळे युद्धाबरोबर तीर्थयात्रा सुद्धा होईल म्हणून लोकं जाण्याचा हट्ट करून बसले. पेशव्यांनी नकार दिला तर ते लोक आमरण उपोषणाला बसले. त्यांच्या हत्येचे पातक आपल्या माथी नको म्हणून त्यांना बरोबर पाठवण्यात आले. त्यामुळे सैन्यबळ अंदाजे पन्नास ते साठ हजार आणि बरोबरचे बाजारबुणगे मात्र दोन लाख. या लोकांमध्ये अनेक बायका देखील होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या युद्धाचे सगळे गणितच चुकत गेले.
  • युद्धात आक्रमण करण्याची तारीख ज्योतिष सल्ल्यानुसार पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली आणि त्याचा परिणाम काय झाला? अब्दालीला तयारीसाठी तेवढा वेळ जास्त मिळाला आणि पानिपतातील तापमान प्रचंड बदलले.
  • अब्दालीने आपल्या युद्धकौशल्याचा छान वापर केला तसेच अलेक्झांडर प्रमाणेच त्याने पाठीमागून हल्ला करण्याचे तंत्र वापरून मराठी सैन्याचे दोन तुकडे तर केले, माघार घेण्याचा रस्ताच बंद करून टाकला, जास्तीची कुमुक यायला वावच ठेवला नाही आणि त्याचे पर्यवसान मराठी सैन्याच्या कत्तलीत झाले. जो गनिमी कावा शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीत वापरत असत तसेच कौशल्य पहिल्या बाजीरावाने यशस्वीपणे सपाटीवर चालविले होते परंतु ते सदाशिवराव अथवा त्यांच्या अन्य साथीदारांना अजिबात जमले नाही.
  • एक कधीही न सुटलेले कोडे म्हणजे मुख्य युद्धभूमीवर विश्वासराव हत्तीवर का बसले होते? कदाचित सैन्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावे हा उद्देश असेलही पण ते करताना शत्रूसाठी आपण अत्यंत सोपे लक्ष (easy target) होत आहोत हे कळलेच नाही. त्यांच्या मृत्यूमुळे सैन्यात पांगापांग झाली आणि त्यामुळे पुढे घडलेल्या कत्तलीला एक प्रकारे आमंत्रणच मिळाले.
  • सरदार विंचूरकर आणि त्यांच्या तोफखान्याने चुकीने पूर्व दिशेला कूच केले आणि त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि अब्दालीने त्यांच्या संपूर्ण तोफखान्याचा कब्जा मिळवला.
  • मराठी सैन्याच्या मदतीस कोणीही उभे राहिले नाही. काही लोकांच्या मते चौथाई वसुली करताना तेथील अनेक राज्यांवर जबरदस्ती झाली होती आणि मराठ्यांबद्दलचा असंतोष खदखदत होता. मराठे जिंकले तर अजून बलवान होतील म्हणून सर्व राजे तटस्थ राहिले किंवा काहींनी तर अब्दालीला मदत केली.
  • मराठी सैन्यातील अंधाधुंद बघून त्यांचा एक खंदा समर्थक, सुरजमल जाट, ज्याच्याकडे मोठे सैन्य होते आणि तेथील भूप्रदेशाची चांगली माहिती होती, याला मराठ्यांचा पराभव स्वच्छ दिसू लागला आणि त्याने ऐन युद्धाच्या तोंडावर मराठ्यांची साथ सोडून दिली. त्याने युद्ध जिंकून परतीच्या मार्गावर अब्दालीची लूट करण्यास प्राधान्य दिले आणि नंतर ते केले देखील.
या आणि अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पानिपतला दारुण पराभव झाला.
 
खरं तर अशा प्रचंड पीछेहाटीनंतर पेशवाई बुडालीच असती परंतु माधवराव पेशवे यांनी आपल्या कर्तृत्वाने ते तर होऊ दिले नाहीच पण मराठा साम्राज्याचे पुनरुत्थान करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. पानिपतच्या युद्धानंतर सहा महिन्यातच, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पेशवाईची धुरा सांभाळली आणि पुढील दहा वर्षात मराठी साम्राज्य उत्तरेत परत फोफावले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली सल्तनतला पण आपले मांडलिक बनवले आणि जवळपास संपूर्ण भारत देश त्यांच्या अंमलाखाली होता. दुर्दैवाने माधवराव पेशवे यांचे वयाच्या केवळ सत्तावीस वर्षी 1772 साली निधन झाले. मराठी साम्राज्यावर हा फार मोठा आघात होता.
 
 
Assessing the impact of the loss of Madhavrao, the writer James Grant Duff eulogised:-
 
And the plains of Panipat were not more fatal to the Maratha Empire than the early end of this excellent prince.”
 
 
यातून शेवटी बोध काय घ्यायचा?
  • मराठ्यांनी विचार करायला हवा होता की आपल्या खांद्याला खांदा लावून कोणीही का उभे राहिले नाहीत?
  • अंगात नुसता जोश असून पुरत नाही तर त्याला बुद्धिमत्ता, युद्धकौशल्य आणि हेरखाते याची जोड असणे हे युद्धात तितकेच किंवा काकणभर जास्तच महत्वाचे असते.
  • कितीही दारुण परिस्थिती निर्माण झाली तरी कर्तृत्वाच्या जोरावर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे शक्य असते.
मराठी माणसाने आज सुद्धा हा विचार करण्याची आत्यंतिक गरज आहे. निदान काही लोकांच्या विचाराला तरी चालना मिळावी हाच माझ्या लेखनाचा उद्देश.
 
 
@ यशवंत मराठे

Leave a comment



Ramesh Deole

2 years ago

अत्यंत कमी शब्दात संपूर्ण पानिपत च्या युद्धाचे विवेचन आणि स्पष्ट मांडणी

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS